खबरदारी घ्या, दक्ष राहा आपल्या सतर्कतेमुळे कोरोनाचा शिरकाव रोखू शकतो- मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांचे आवाहन
बीड, ......- कोरोनाचे विषाणूचे संकट म्हणजे गावाच्या सेवेसाठी आपल्याला मिळालेली एक संधी आहे त्यामुळे गावातील गावात शांतता, सलोखा कायम राखत कोरोनाचा शिरकाव होऊ नये यासाठी सर्व आदेशांचे काटेकोरपणे पालन करावे. खबरदारी घ्या, दक्ष राहा आपल्या सतर्कतेमुळे कोरोनाचा शिरकाव रोखू शकतो, असे आवाहन करताना जिल्ह्यातील सर्व सरपंच, ग्रामसेवक यांना ग्रामस्थांसह कोरोना विषाणूला आपण आपल्या गावापासून दूर ठेवण्यात आत्तापर्यंत यशस्वी झाले आहात. या कोरोना विषाणू या रोगाचा प्रसार रोखण्यासाठी संकटाच्या काळात विविध उपाय योजना करत गावकऱ्यांचे मनोबल निश्चितच उंचावण्याचे काम कौतुकास्पद आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी जिल्ह्यातील सर्व सरपंच, ग्रामसेवक यांना पत्र पाठवून सतर्क केले आहे.
जिल्हयात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 दिनांक 13 मार्च 2020 पासून संपूर्ण राज्यात लागू झाला असून संपूर्ण देशात आता लोक डाऊन कालावधी ३ मे २०२० पर्यंत वाढवला आहे. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना, संचारबंदी, जमाबंदी तसेच जिल्हाबंदी आदेश जिल्ह्यात लागू केले आहेत. कोरोना विरुद्धच्या या लढाईत आपण आता निर्णायक टप्प्यावर आलो आहोत या पुढे काही दिवस आपल्यासाठी आव्हानात्मक असून आपण सतर्क राहून प्रतिबंधात्मक उपायोजना आणखी कडक करणे आवश्यक आहे. यासाठी आपण पुढील प्रमाणे कार्यवाही करावी.
कोरोना प्रतिबंधात्मक ग्रामसुरक्षा पथकाची स्थापना करुन गावाची सुरक्षा
आपल्या जिल्ह्याला इतर काही जिल्ह्याच्या सीमा लागून आहेत तसेच आपल्या गावाला वेगवेगळ्या दिशेने येणारे अनेक रस्ते आहेत . त्यामुळे अशा रस्त्यावर लक्ष ठेवून जिल्हा बाहेरील कोणीही नागरिक गावात प्रवेश करणार नाही याची दक्षता पण घेणे आवश्यक आहे. त्यासाठी गावातीलच सुजान, सतर्क अशा दोन-तीन युवकांचा समावेश करून एक पथक तयार करावे . तसेच आवश्यकतेप्रमाणे पथकांची संख्या ठरवून आपल्या गावात बाहेरून येणाऱ्या सर्व रस्त्यांवर गाडीमार्ग , पायवाटांवर चेक पोस्ट तयार करून अशा पथकाचे 24 तासांसाठी (दोन शिफ्टमध्ये) नेमणूक करावी पथकातील सदस्यांनी बाहेरील जिल्ह्यातील नागरिकांना प्रवेशास प्रतिबंध करावा . पथकातील सदस्यांची नेमणूक ही संबंधित ग्रामपंचायतीच्या सरपंच व ग्रामसेवक यांचे संयुक्त स्वाक्षरीने करावी, असे आदेश हे त्वरित संबंधित गाव हे ज्या पोलीस स्टेशन अंतर्गत असेल तेथील पोलीस निरीक्षक यांच्याकडे माहितीस्तव पाठवावेत. पथकातील सदस्यांनी नेमणुकीचे आदेशाचे एक प्रत व फोटो आयडी आपल्या सोबत ठेवावे. बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांच्या प्रवेशास प्रतिबंध करत असताना अशा नागरिकांना पथकातील सदस्यांनी मा.जिल्हाधिकारी यांच्या जिल्हा बंदी आदेश समजावून सांगावा. कोणी गावांमध्ये प्रवेश करण्यासाठी आग्रही व प्रयत्नशील असेल तर अशा व्यक्तींची माहिती नजीकच्या पोलिस स्टेशनला द्यावी. पथकातील कोणत्याही सदस्यांनी कोणत्याही नागरिकास गैरवर्तन व मारहाण करू नये . नियमबाह्य पद्धतीने गावामध्ये प्रवेश केलेल्या जिल्ह्या बाहेरून आलेल्या व्यक्तीची स्वतंत्र व्यवस्था गावातील शाळेत, गावच्या सभागृहात करण्यात यावी. अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या वाहनांना, व्यक्तींना प्रतिबंध करू नये, त्यांची नोंद नोंदवहीमध्ये ठेवावी.
गावातील जे नागरिक कामानिमित्त बाहेरगावी विशेषतः पुणे-मुंबई औरंगाबाद अहमदनगर व इतर ठिकाणीआहेत त्यांना आहे त्याच ठिकाणी थांबवण्या विषयी फोनवरून सूचना द्यावी , तसेच मान्य जिल्हाधिकारी बीड यांचे आदेशान्वये जिल्ह्यात प्रवेश बंदी असल्याचे त्यांना अवगत करावे. गावात शंभर टक्के संचारबंदी चे व जमावबंदीचे पालन करावे हे करत असताना गावातील वृद्ध, गरोदर स्त्रिया , बालके , विविध आजाराने पीडित लोकांची काळजी घ्यावी , त्यांना घराबाहेर पडू न देता त्यांच्या आवश्यक गरजांचा पुरवठा घरीच होईल याची दक्षता घ्यावी.याप्रसंगी कोणाविषयी कुठलाही द्वेष- सूडबुद्दी मनात न ठेवता काम करावे असे श्री. कुंभार यांनी या पत्रादवारे सांगितले आहे.
०००००