बीड जिल्ह्यात मिशन 100% ग्रीन झोनसाठी काम - पालकमंत्री धनंजय मुंडे


लोक भावने बरोबरच जिल्ह्यातील जनतेच्या आरोग्याला महत्त्व 


कोरोना प्रादुर्भावापासून जिल्ह्याला वाचविण्यासाठी निर्णय घेण्यास महत्व


कृषी सह ,आरोग्य , कापूस खरेदी  अडचणी सोडविण्यासाठी  तातडीने पाठपुरावा 


बीड,...... जिल्ह्याचा समावेश ऑरेंज झोनमध्ये झाला असला तरीही जिल्हा मिशन 100% ग्रीन झोन मध्ये जाईल. कोरोनाचा प्रादुर्भावापासून जिल्ह्याला वाचवण्यासाठी निर्णय घेतले जात असून लोकभावने बरोबरच जिल्ह्यातील जनतेच्या आरोग्याला महत्व दिले जात आहे असे प्रतिपादन पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केले


जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रगती सभागृहात राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली यावेळी ते बोलत होते. बैठकीस आमदार संदीप क्षीरसागर, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम उपस्थित होते.


पालकमंत्री म्हणाले जिल्ह्यात 17 मेपर्यंत लॉक डाऊन वाढविण्यात आले आहे. बदलत्या परिस्थितीत सर्व बाबींचा विचार करून पावले टाकली जात आहेत. लोकांच्या अडचणी कमी व्हाव्यात व संसर्ग येऊ नये यासाठी प्रयत्न केले जात आहे. जनतेच्या आरोग्यासाठी झटणाऱ्या डॉक्टरांची देखील काळजी घेणे गरजेचे आहे. यासाठी सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी पी पी ई किट देण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या आहेत. जिल्ह्यासाठी 9000 पीपीई किट उपलब्ध करून दिले आहेत व्हेंटिलेटर खरेदीेतील अडचणी दूर होण्यासाठी मंत्रालयीन स्तरावर सूचना देऊन तातडीने कार्यवाही करावी असे सांगितले.


ते म्हणाले याच बरोबर शेतकऱ्यांच्या सोयीच्या दृष्टीने बांधावर डिझेल हा उपक्रम सुरू करण्यात येत असून सुरुवातीस असे एक सुसज्ज वाहन उपलब्ध करून दिले जात आहे. यावर डिझेल वितरणाची मिटर, किंमत दर्शवणारीे यंत्रणा असून इंडियन ऑइल कार्पोरेशनच्या सहकार्याने हे वाहन जिल्ह्यात उपलब्ध झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या डिझेल इंधनाचा प्रश्न सुटणार आहे. 


मंत्री महोदयांनी पुढे सांगितले बीड मधील इतर जिल्ह्यात अडकलेल्या लोकांना बीडमध्ये येण्यास परवानगी दिली जात असल्याने पोलीस यंत्रणेवरील वाढणारा ताण लक्षात घेता साडेपाचशे होमगार्ड जवानांची सेवा जिल्ह्यातील पोलीस विभागात मिळाव्या यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री अजित पवार व गृहमंत्र्यांशी चर्चा करून प्रश्न सोडविण्यात आला आहे.


ते म्हणाले बाहेरच्या जिल्ह्यात अडकलेल्या लोकांना जिल्ह्यात येण्यासाठी परवानगी दिली जात असून याचा उपयोग तात्पुरत्या कारणांसाठी बाहेर जिल्ह्यात गेल्यानंतर अडकलेल्या व्यक्तींना व्हावा पण नोकरी व काम धंदा निमित्य इतर जिल्हा व शहरात राहणाऱ्यांनीा बीड जिल्ह्यात येण्यासाठी याचा वापर करू नये.


पालकमंत्री श्री. मुंडे पुढे म्हणाले, संचार बंदीच्या काळात अकरा शहरातील नागरिकांना किराणा उपलब्ध होण्यासाठी प्रशासनाने निडली ॲप सुरू केले असून पुढे याद्वारे जीवनावश्यक वस्तू देखील लोकांना पोहोचविण्यासाठी सुविधा उपलब्ध केली जाईल.


याच बरोबर आढावा बैठकीत उपस्थित करण्यात आलेल्या कापूस खरेदी साठी जिल्ह्यातील तेरा जिनिंग केंद्र मध्ये सहा ग्रेडर उपलब्ध असल्याने उद्यापर्यंत आणखी चार ग्रेडर उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या तसेच खरिपाची तयारी करताना जिल्ह्यात 80 हजार क्विंटल सोयाबीन बियाण्याची कमतरता असल्याने कृषिमंत्री दादा भुसे यांच्याशी चर्चा करून सदर बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा करण्यात आला आहे. विवाहाच्या  प्रसंगी 20 नातेवाईकांना उपस्थित राहण्यासाठी नियमात शिथिलता देण्यासाठी राज्यस्तरावरून निर्णय व्हावा  यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांच्याकडे पाठपुरावा  करण्यात आल्याचेही पालकमंत्री श्री. मुंडे यांनी सांगितले


यावेळी जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांनी  नागरिकांसाठी  पास उपलब्ध होणाऱ्या  ऑनलाइन प्रक्रियेद्वारे  आत्तापर्यंत  365 अर्ज  प्राप्त झाले असून  45 परवानगी दिली तसेच जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेसाठी नवीन 30 व्हेंटिलेटर घेण्यात येत असल्याची  माहिती दिली  गेल्याचे सांगितले .


पोलीस अधीक्षक श्री. पोद्दार यांनी पोलीस दलाच्या मदतीसाठी उपलब्ध होणाऱ्या होमगार्ड जवानांना एस डी आर एफ च्या प्रशिक्षणानंतर कर्तव्यावर पाठविले जाईल असे सांगितले
याप्रसंगी आरोग्यसह कृषी , पणन, पोलीस विभागाशी संबंधित विषयांवर चर्चा झाली
००००