जिल्ह्यातील सर्व जलसाठे पिण्याच्या पाण्यासाठी राखून ठेवण्यात यावे- जिल्हाधिकारी राहुल रेखावार

 


माणसांबरोबरच जनावरांसाठी देखील पाण्याच्या उपलब्धतचेे नियोजन करावे 


व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उपविभागीय अधिकारी  मुख्याधिकारी  आणि  सर्व तालुक्यातील तहसीलदार यांना सूचना 


बैठकीत विविध विषयांशी संबंधित कामाचा आढावा


बीड,  .........- जिल्ह्यातील सर्व जलसाठे पिण्याच्या पाण्यासाठी राखून ठेवण्यात येत असून या पाण्याचा रक्षणाची जबाबदारी तहसीलदार यांना देण्यात येत आहे. यासाठी पथके नेमून जलसाठ्यांचे रक्षण केले जावे. माणसांबरोबरच जनावरांसाठी देखील पाण्याची उपलब्धता राहील असे नियोजन करावे  असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले.


आज मान्सूनपूर्व आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रगती सभागृहात झाली यावेळी ते बोलत होते बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात, उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यासह जिल्ह्यातील विविध विभागांचे प्रमुख पदाधिकारी आणि व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उपविभागीय अधिकारी, मुख्याधिकारी  आणि  सर्व तालुक्यातील तहसीलदार उपस्थित होते.


जिल्हाधिकारी श्री. रेखावार म्हणाले जिल्ह्यातील जलसाठ्याामध्ये असलेल्या पाण्याचा अवैध उपसा रोखण्यात यावा यासाठी अवैध मोटारी तात्काळ बंद कराव्यात. नागरिकांना शुद्ध पाण्याचा पुरवठा व्हावा यासाठी लक्ष दिले जावे . तलाठी यांनी  गावासाठी आवश्यक पाण्याचा साठा अथवा जवळचा जलस्रोत शोधून ठेवणे गरजेचे आहे दूषित पाण्यामुळे विविध आजाराचा प्रादुर्भाव होऊ शकतो त्या दृष्टीने आरोग्य विभागाने काळजी घ्यावी.
         ते म्हणाले जिल्ह्यातील सरासरी दूषित पाण्याचे प्रमाण 29 टक्के पर्यंत असल्याचे आरोग्य विभागाने सांगितल्याने याच्या कारणांचा देखील शोध घेतला जावा व  प्रक्रिया करूनशुद्ध पाण्याचे  पाणीपुरवठा होईल याकडे लक्ष दिले जावे.


याप्रसंगी तालुकानिहाय पाणीपुरवठ्याचा आढावा घेण्यात आला. टँकर मंजुरीचे अधिकार उपविभागीय अधिकारी स्तरावर आहेत. यावेळी पाणी स्थिती चांगली असल्याने टँकर मंजुरीबाबत दक्षता घेतली जावी अस श्री. रेखावार यांनी सांगितले 


मान्सून वेळेत न आल्यास आष्टी शहराबरोबरच तालुक्यातील गावांसाठी पाण्याचा पुरवठा राहण्याच्या दृष्टीने सीना प्रकल्पातील देखील पाण्याची गरज असून  त्या दृष्टीने तालुका प्रशासनाने नियोजन करावे.


आष्टी तालुका व धारूर मधील काही भाग वगळता जिल्ह्यातील इतर तालुक्यांना पुरेसा जलसाठा उपलब्ध असल्याचे दिसून येत असल्याने जुलै अखेरपर्यंत हे पाणी पुरवण्याच्या दृष्टीने संबंधित तहसीलदार यांनी गटविकास अधिकारी, जलसंपदा विभागाचे अधिकारी यांच्यामार्फत नियोजन करावे अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या.


याच बरोबर जिल्ह्यातील विविध विषयांशी संबंधित कामाचा आढावा देखील जिल्हाधिकारी यांनी घेतला. व महत्वाच्या विषयांमध्ये संबंधितांना कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. 
यामध्ये कृषी विभागाच्या वतीने खरीप पेरणी साठी खते व बियाण्यांची तयारी, जिल्हा आरोग्य विभागामार्फत पावसाळ्यातील आजार व त्यादृष्टीने करण्यात येणारे पुर्वतयारी, पूरस्थिती उद्भवल्यास गावांचा संपर्क तुटू नये  यासाठी उपाययोजना आणि नगर परिषद मार्फत पाण्याचा निचरा वेगात व्हावा यासाठी गटारी व नाले  मोकळे करण्याची कामे केली जावे इत्यादी विषयांवर चर्चा होऊन सूचना करण्यात आल्या.


यावेळी आरोग्य विभाग, जलसंपदा विभाग आणि कृषी विभागाचे संबंधित विविध माहिती सादर करण्यात आली. तसेच सर्व संबंधित तहसीलदार यांनी तालुक्यातील पिण्याच्या पाण्यासाठी उपलब्ध जलसाठे आणि जुलै अखेर पिण्याच्या पाण्याचे नियोजन या दृष्टीने माहिती दिली.
००००००